मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो. मराठी आपली मातृभाषा आहे.मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. म्हणजेच कोणत्याही युरोपियन देशापेक्षा मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे .मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषेचे प्राचीनत्व 2000 वर्षांपूर्वीपर्यंत मागे जाते.मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे.
मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
लीळाचरित्र हा मराठीतील आद्य ग्रंथ समजला जातो, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधु, ज्योतिष रत्नमाला इत्यादी ग्रंथ मराठी मध्ये लिहिलेले आहेत.
विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चार मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.
'मूर्तिदेवी पुरस्कार' शिवाजी सावंत यांना मृत्युंजय या कादंबरीसाठी मिळाला आहे.
महेश एलकुंच़वार आणि विजय तेंडुलकर या लेखकांना 'सरस्वती सन्मान' मिळाले आहेत.
विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांना 'कालिदास सन्मान' मिळाले आहेत.
मित्रांनो साहित्य क्षेत्रामध्ये मराठीचा झेंडा खूप अभिमानाने फडकत आहे परंतु गणित आणि विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये मात्र मराठी खूपच मागे आहे. आणि त्यासाठी मी पूर्णपणे महाराष्ट्रातील शासकीय धोरणांना दोष देईल. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने ठरवून ठेवलेला आहे कि, मराठी भाषेतून गणित आणि विज्ञान हे व्यक्त होऊ शकत नाही. आज सेमी इंग्रजी च्या माध्यमातून पहिल्या वर्गापासून विज्ञान आणि गणित हे इंग्रजीतून शिकवले जात आहे. आणि विज्ञानाच्या, गणिताच्या पदवीचे शिक्षण मराठीतून तर अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. मित्रांनो भाषिक कौशल्य शिकण्यासाठी आवश्यक बुद्धी आणि विज्ञान किंवा गणित शिकण्यासाठी आवश्यक बुद्धी ही वेगळी असते आणि मराठी विद्यार्थ्यांचे दुर्दैव त्यांना सर्वप्रथम इंग्रजी शिकण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घालावी लागते आणि त्यातून विज्ञान आणि गणित शिकावे लागते. मी कधी ऐकलं नाही कि बाईक चालवण्यासाठी किक इंग्रजी मधून मारावी लागते किंवा डॉक्टर हर्नियाचे ऑपरेशन इंग्रजी भाषेतून करतात. प्रत्येक भाषेला स्वतःची वैशिष्ट्ये असतात जसं जग बदलतं तशी भाषेची वैशिष्ट्ये ही बदलवने गरजेच असतं आणि ते त्या भाषिकांना करायचं असतं, जगातील कितीतरी भाषा विज्ञान व्यक्त करण्यास अपुऱ्या होत्या त्याला इंग्रजी ही अपवाद नव्हती, इंग्रजी भाषेच्या विद्वानांनी इंग्रजी भाषेस 'विज्ञान भाषा' करण्यासाठी खूप कष्ट घेतले, त्यामानाने मराठी विद्वानांनी मात्र आळस दाखवला असे वाटते. त्याचा परिणाम असा झाला की बहुतांश मराठी भाषिक गणित आणि विज्ञान या पासून खूप दुरावले. जगामध्ये अशा ही भाषा आहेत की त्या भाषा त्या भाषिकांनी सर्व क्षेत्रात अव्वल भाषा बनवल्या. त्यापैकीच एक म्हणजे जपानी भाषा.
आता आपण मराठी आणि जपानी ह्यां भाषेच्या प्रगतीची तुलना करू..
(अ) जपाननं इग्रंजी माध्यम कटाक्षानं दूर ठेवलं. लिपी कमालीची क्लिष्ट आणि जपानीत वैज्ञानिक शब्दांची पराकोटीची वाण, पण न थकता त्यांनी शब्द घडवले.
(आ) विज्ञान मातृभाषेत असल्याचा जपानच्या समाजाला केवढा लाभ झाला ते लक्षात घेतलं तर हा भेद प्रकर्षांनं जाणवेल. आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टी नाही, असा आपण केवळ कंठशोष करीत असतो, पण तशी दृष्टी येण्यासाठी विज्ञान समाजाच्या भाषेत उपलब्ध हवं. तसं झाल्याशिवाय सामान्यजनांपर्यंत विज्ञान पोहोचेल कसं? आणि विज्ञान समजलंच नाही, तर वैज्ञानिक दृष्टी समाजात मूळ धरील कशी?
आपल्या देशातील खेडय़ापाडय़ांत बुद्धीची वानवा आहे काय? मुळीच नाही. तुटवडा कशाचा असेल तर, त्या संदर्भातलं प्रशिक्षण परकीय भाषेतच मिळतं, समाजाला समजणार्या भाषेत नसतं हाच. काही उदाहरणंच देतो. आमच्या गावच्या एका तरुणाने मोटारसायकल दुरुस्तीसाठी असणारे मोटर सायकल उचलणारे मशीन स्वतः तयार केले. कराडच्या एका लोहार काम करणाऱ्या व्यक्तीने चार चाकी गाडी तयार केली त्याची नोंद चक्क आनंद महिंद्रा यांनी घेतली. परंतु त्यांचं काम बेंगरूळ असतं, कारण त्या संबंधातील प्रशिक्षणात ते मार खातात. सायकलवर चालणारं धुण्याचं यंत्र, उन्हावर चालणारं जनित्र इत्यादी यंत्रं प्रशिक्षण नसतानाही आपल्या तरुणांनी बनवली आहेत. आपल्या भाषांतून विज्ञान वाहत राहिलं, तर आपली मुलंही जगाला दिपवणारी कामगिरी करू शकतील असं वाटत नाही का?
(इ) विज्ञान जपानी भाषेत असल्याचा परिणाम म्हणून बहुतांश जपानी समाज विज्ञाननिष्ठ झाला आणि परिणामत: राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थांची संख्या जपानमध्ये ५,३०० असून भारतात केवळ १९ आहे. म्हणजे आपल्या पावणेतीनशे पट! थोडी अधिकच आणि जपानपेक्षा आपली लोकसंख्या साडेनऊपट आहे, म्हणून २६५० पट. म्हणजे आपल्याकडे ५० हजारांच्या वर संस्था होतील तेव्हा आपण जपानच्या बरोबरीला पोहोचू.
(ई) परदेशांत प्रतिदिन काही संशोधन प्रसिद्ध होत असतं. जपानीतून शिकलेल्या संशोधकांना त्यांचा उपयोग काय, अशी शंका तुम्हाला येईल, पण कुठंही कोणत्याही विषयावर काहीही प्रसिद्ध होवो, अल्पावधीतच त्याचं जपानी रूपांतर वैज्ञानिकांना उपलब्ध करून दिलं जातं. इंग्रजी शिकण्यात वैज्ञानिकांची शक्ती वाया जाऊ दिली जात नाही. इथं मात्र आपल्या बालकांची सहा ते सात अमोल र्वष आणि बौद्धिक शक्ती इंग्रजी आणि इंग्रजीतून शिकण्यात वाया जातात! म्हणजे प्रतिवर्षी किती मनुष्यर्वष? करा आकडेमोड. त्याउलट, आपल्याकडे काय परिस्थिती आहे? १९६६ साली कोठारी आयोगाचा वृत्तांत बाहेर आला. त्यानुसार पुस्तकांचं भारतीय भाषांत भाषांतर आणि नव्यानं पुस्तकलेखन करायचं ठरलं. प्रत्येक विद्यापीठाकरिता एकेक कोटी रुपयांची सोय करण्यात आली. किती पुस्तकं प्रसिद्ध झाली? महाराष्ट्रातील विद्यापीठांनी स्वतःला हा प्रश्न विचारावा.उत्कृष्ट परकीय पुस्तकांचा अनुवाद तर करावाच, पण इथल्या लेखकांकडूनही पुस्तकं लिहून घ्यावीत. आपल्या मुलांच्या समस्या आपल्याला माहीत की परकीयांना? अशा परिस्थितीत आपलं एकही विद्यापीठ नाव घेण्यासारखं काम करीत नाही, याबद्दल खंत वाटते.
जपान आपल्यापेक्षा दहाव्या हिश्शानं लहान. तुलनेनं अर्वाचीन, नवीन आणि आपला देश महान, पुरातन, संस्कृती मोठी. मोंगलांनी नालंदाचं ग्रंथालय जाळलं तर सहा महिने जळत होतं! पण जपानची सहा विद्यापीठं जगातल्या पहिल्या उत्कृष्ट २०० विद्यापीठांत बसतात. आपल्या महान देशाच्या तुलनेत चिल्लर अशा कॅनडा, स्वित्र्झलड, हाँगकाँग, सिंगापूर, फ्रान्स, द. कोरिया, फिनलंड, स्वीडन, बेल्जियम, तवान, न्यूझीलंड या देशांच्या विद्यापीठांचीही नावंही यादीत आहेत, पण भारताच्या एकाही नाही! याच काय?
बालभारती सारख्या संस्थांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.मराठी राज्यकर्त्यांनी जेवढं नाही नाही केल त्या पेक्षा जास्त मराठी भाषेसाठी काही भारतीय व परदेशी कंपन्या स्वतःच्या फायद्याकरता करत आहेत. त्यातून आपली भाषा समृद्ध होत आहे.
आपल्या मातृभाषेच्या संदर्भात आपलेही काही कर्तव्य आहेत ती आपण पूर्ण केली पाहिजेत उदाहरणार्थ
१) मातृभाषेत आपण विविध प्रकारचे लेखन केले पाहिजे. कथा काव्य कादंबरी प्रवासवर्णने आपले अनुभव मातृभाषेत शब्दबद्ध केले पाहिजेत.
२) सोशल मीडिया वरील लिखाण मातृभाषेतून केलं पाहिजे, त्यासाठी आवश्यक विविध नवनवीन शब्द निर्माण केले पाहिजेत शब्द जर योग्य असतील तर त्याचा स्वीकार होऊ शकतो.
३) आपण जे विविध प्रकारची ॲप्स वापरतो त्यांची मुख्य भाषा आपण मराठी ठेवली पाहिजे, जर आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या मातृभाषेचा वापर करायला लागलो तर विविध कंपन्या आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची ॲप्स, वेब मराठीत बनवतील, त्यांनाही वेळोवेळी भाषेच्या संदर्भात सुधारणा प्रतिसाद दिले पाहिजेत.
४) दर्जेदार मराठी साहित्य कलाकृती, चित्रपट, नाटक, युट्युब चित्रफिती यांना प्रोत्साहन द्यावे.
५) अन्य भाषेतील दर्जेदार साहित्य आपल्या भाषेत भाषांतरित केल्या पाहिजेत. साहित्य म्हणजे फक्त कथा कादंबऱ्या नव्हेत तर विविध विषयांवर प्रकाशित होणारे माहितीलेख सुद्धा.
मित्रांनो आपल्या भाषेला आपणच भविष्य दिले पाहिजे तरच आपलेही भविष्य असेल. आणि आपली भाषा ही आपल्या पूर्वजांनी त्यांच्या काळानुरूप समृद्ध करून ठेवली आहे आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या काळानुरूप तिला समृद्ध केले पाहिजे तरच आपण म्हणू शकतो,
माझा मराठी चा बोल कौतुके।परि अमृताते हि पैजा जिंके।ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा