शैक्षणिक बातम्या

'वन अप ऑन वॉल स्ट्रीट' One Up On Wall Street लेखक- Peter Lynch या पुस्तकाचा स्वैर सारांश

ऐकून आश्चर्य वाटेल, मित्रांनो! शेअर बाजारात पैसे कमवायला तुम्हाला काही फार मोठे ज्ञानी होण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या साध्या, रोजच्या जगण्यातल्या अनुभवांवर आणि थोड्याशा कॉमन सेन्सवर विश्वास ठेवला ना, तर हे मोठे-मोठे विश्लेषक, फंड मॅनेजर आणि मार्केटचे गुरु सुद्धा तुमच्यापुढे फिके पडतील! खरं सांगतो, हे अगदी खरं आहे! पीटर लिंच नावाचे एक गृहस्थ होऊन गेले, ज्यांना जगातले सर्वात यशस्वी गुंतवणूकदार मानले जाते. त्यांनी 'वन अप ऑन वॉल स्ट्रीट' नावाचं एक कमाल पुस्तक लिहिलंय. त्यात ते हेच सांगतात की एक साधा माणूस सुद्धा, कुठल्याही किचकट आर्थिक गोष्टींमध्ये न पडता, शेअर बाजारात मस्तपैकी पैसे कसे कमवू शकतो.
आता तुम्हाला वाटेल, 'काय सांगताय? शेअर बाजार तर फक्त श्रीमंतांसाठी किंवा ज्यांना इकोनॉमिक्स वगैरे खूप कळतं त्यांच्यासाठी असतो!' पण थांबा! तुमचा विचार एकदम चुकीचा आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला थोडं लक्ष दिलं ना, तरी तुम्हाला शेअर बाजारात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग दिसतील.
राकेश झुनझुनवाला यांना सारेच ओळखतात ते एक मोठे गुंतवणूकदार होते. त्यांनी टायटन कंपनीचा शेअर तेव्हा खरेदी केला, जेव्हा लोक फक्त त्या कंपनीच्या दुकानांना पाहत होते. म्हणजे, लोकांना ती उत्पादनं आवडत होती, दुकानं वाढत होती, हे राकेश झुनझुनवाला यांनी ओळखलं आणि त्यात गुंतवणूक केली.. तसंच, डी-मार्ट! त्याचे स्टोअर्स गल्ली-गल्लीत, परिसरात दिसायला लागले आणि त्याचा स्टॉक वाढत गेला. जर तुम्ही या कंपन्यांचे ग्राहक असता, तर तुम्हाला तेव्हाच अंदाज आला असता की यात काहीतरी खास आहे!
आणि हाच पीटर लिंचचा सगळ्यात मोठा मंत्र आहे – तुम्हाला जे माहित आहे, त्यात गुंतवणूक करा. शेअर बाजार काही जुगार नाही. ती एक कला आहे आणि यात जिंकणारे ते नाही जे दिवसभर स्टॉक मार्केटच्या टीव्हीवर बातम्या बघतात, तर ते आहेत जे आपल्या बुद्धीचा योग्य वापर करतात.
आज आपण पीटर लिंचची काही खास गुंतवणूक तत्त्वं बघणार आहोत, जी तुमचं आर्थिक भविष्य बदलू शकतात. हा नुसता पुस्तकाचा सारांश नाहीये, तर एक विचारसरणी आहे जी तुम्हाला एक चांगला गुंतवणूकदार बनवू शकते. चला तर मग, 'वन अप ऑन वॉलस्ट्रीट'च्या या प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया की एक सामान्य माणूस सुद्धा शेअर बाजारातील तज्ञांपेक्षा जास्त कमाई कशी करू शकतो, आणि करोडपती अब्जाधीश कसा बनू शकतो!
अध्याय एक : यशस्वी गुंतवणूकदाराची मानसिकता
मित्रांनो, बहुतेक लोकांना वाटतं की शेअर बाजार म्हणजे फक्त फायनान्समध्ये मास्टरी केलेल्या लोकांसाठी, मोठ्या गुंतवणूकदारांसाठी किंवा शेअर मार्केटच्या पंडितांसाठी आहे. असं म्हणतात की जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला किचकट आर्थिक स्टेटमेंट्स, आकडेमोड, चार्ट्स आणि बाजाराच्या हालचालींचं एकदम खोलवर ज्ञान पाहिजे.पण पीटर लिंच म्हणतात की गुंतवणूक करणं काही रॉकेट सायन्स नाहीये! हा तर साधा कॉमन सेन्स आणि निरीक्षणाचा खेळ आहे. एक सामान्य गुंतवणूकदार सुद्धा वॉल स्ट्रीटच्या मोठ्या-मोठ्या तज्ञांपेक्षा चांगलं काम करू शकतो. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्याCommon Sense चा योग्य वापर करायचा आहे.
आता विचार करा, १०-१५ वर्षांपूर्वी जर तुम्ही टायटनचे ग्राहक असता. तुम्हाला सगळीकडे त्यांची दुकानं वाढत असलेली दिसली असती, डी-मार्टमध्ये नेहमी झुंबड दिसत असली असती किंवा जॉकीचे अंडरवेअर सगळ्यांच्या घरात दिसत असले असते, तर तुम्हाला काय समजलं असतं? हे सगळे व्यवसाय त्यांच्या क्षेत्रात एकदम टॉपला चालले होते! जर एका सामान्य माणसाने या ब्रँड्सना तेव्हा ओळखलं असतं आणि त्यांच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले असते, तर आज त्याचे पैसे १०० पट किंवा त्याहून जास्त झाले असते!
पीटर लिंच म्हणतात, "तुमच्या आजूबाजूला बघा. ज्या गोष्टींना मागणी आहे, ज्या कंपन्या वाढत आहेत, त्या तुमच्यासाठीच आहेत." तुम्हाला स्टॉक मार्केटचा तज्ञ बनायची गरज नाही, फक्त तुमची निरीक्षण शक्ती तीक्ष्ण करा आणि कॉमन सेन्स वापरा. जर एखादी गोष्ट धडाधड विकली जात असेल, लोकांना ती आवडत असेल आणि व्यवसाय वाढत असेल, तर समजून घ्या की तो स्टॉक सुद्धा वाढणार आहे. गुंतवणुकीचा हा एकदम साधा नियम आहे. ज्या कंपन्या लोकांची गरज बनत चालल्या आहेत, त्यांच्या स्टॉकमध्ये भविष्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
आपल्यापैकी बहुतेक लोकांना असं वाटतं की मोठे फंड मॅनेजर, आर्थिक विश्लेषक आणि वॉल स्ट्रीटच्या तज्ञांकडे काहीतरी जादूची शक्ती असते, जी सामान्य गुंतवणूकदारांकडे नसते. पण पीटर लिंच म्हणतात की खरं तर सामान्य गुंतवणूकदारांकडे एक खास गोष्ट असते, जी या प्रोफेशनल लोकांकडे नसते! कारण हे प्रोफेशनल लोक नेहमी आकडे, चार्ट आणि तिमाही निकालांमध्ये अडकलेले असतात, तर सामान्य माणूस त्याच्या रोजच्या जगण्यातल्या अनुभवांवरून चांगले गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकतो.
उदाहरण घ्या, तुम्ही प्रत्येक वेळी ऑनलाइन शॉपिंगसाठी Nykaa वापरता आणि तुम्हाला दिसतं की तुमच्या बहिणी आणि मैत्रिणी सुद्धा तेच पसंत करतात. किंवा तुम्हाला असं वाटतं की Zomato आणि Swiggy शिवाय लोकांसाठी जेवण ऑर्डर करणं आता एकदम कठीण झालंय. हे तुमच्यासाठी एक सिग्नल असू शकतं की या कंपन्या भविष्यात खूप मोठ्या होऊ शकतात. जर तुम्ही या कंपन्यांचे ग्राहक असाल आणि तुम्हाला वाटत असेल की त्या मार्केट लीडर बनू शकतात, तर तुम्ही त्यांचे स्टॉक लवकर घेऊ शकता. मोठे गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड या कंपन्यांवर लक्ष ठेवायच्या आधी, तुम्हाला ही संधी मिळू शकते. (इथे मी फक्त शिकवण्यासाठी Zomato आणि Swiggy चं उदाहरण दिलंय, खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही.)
प्रोफेशनल गुंतवणूकदारांवर अनेक बंधनं असतात. त्यांना प्रत्येक तिमाहीच्या आकडेवारीनुसार निर्णय घ्यावे लागतात. त्यांच्याकडे खूप जास्त डेटा असतो आणि जमिनीवर काय चाललंय हे बघायला त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण एका सामान्य गुंतवणूकदाराला त्याच्या Common Sense आणि निरीक्षणाचा वापर करून भविष्यात मोठे पैसे देणाऱ्या स्टॉकला ओळखण्याचं स्वातंत्र्य असतं.
पीटर लिंच म्हणतात की जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघायला सुरुवात केली आणि लोक काय वापरत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला शेअर बाजारातील मोठ्या लोकांपेक्षाही चांगल्या कंपन्या सापडतील. गुंतवणुकीचा हाच खरा फॉर्म्युला आहे – तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जो स्टॉक आवडतो, तो... दीर्घकाळात शेअर बाजारातही वाढणार आहे.
पण फक्त हे पुरेसं नाहीये. शेअर बाजारात पैसे कमवण्याचा सगळ्यात मोठा नियम आहे – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. पीटर लिंच म्हणतात की गुंतवणुकीतील सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे गुंतवणूकदार स्वतः! लोक बाजारात पैसे गमावतात कारण त्यांनी चुकीच्या कंपनीत गुंतवणूक केली नसते, तर ते भीती किंवा लोभाचे बळी ठरतात.
जेव्हा बाजार खाली येतो, तेव्हा लोक घाबरून आपले शेअर्स विकून टाकतात आणि जेव्हा बाजार वर जात असतो, तेव्हा विचार न करता नवीन शेअर्स खरेदी करतात. २०२० मध्ये भारतात जो कोविड-१९ चा काळ होता, ते याचंच उत्तम उदाहरण आहे. जेव्हा बाजार ३०-४०% नी खाली आला, तेव्हा बहुतेक गुंतवणूकदार घाबरले आणि त्यांनी आपले शेअर्स विकायला सुरुवात केली. पण ज्यांनी धीर धरला आणि चांगल्या कंपन्यांचे जास्त शेअर्स खरेदी केले, त्यांचे पैसे फक्त एक-दोन वर्षात दुप्पट झाले! ज्यांनी टायटन, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्ससारखे शेअर्स घसरत्या किमतीत खरेदी केले (२०२१-२०२२ मध्ये), त्यांना मोठा फायदा झाला. पण ज्यांनी घाबरून विक्री केली, त्यांना फक्त नुकसान झालं.
पीटर लिंच म्हणतात की गुंतवणूकदाराचा संयम ही त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. जर तुम्ही चांगली कंपनी ओळखली आणि दीर्घकाळसाठी गुंतवणूक केली आणि बाजारातील थोड्यावेळेच्या चढ-उतारांना घाबरला नाहीत, तर तुम्ही खूप मोठे पैसे कमवू शकता. सगळ्यात सोपा नियम आहे – जेव्हा सगळे घाबरून विक्री करत असतील, तेव्हा खरेदी करा आणि जेव्हा सगळे उत्साहात येऊन विचार न करता स्टॉक खरेदी करत असतील, तेव्हा जरा सावध राहा. जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलात, तर तुम्ही एका सरासरी गुंतवणूकदारापेक्षा जास्त पैसे कमवू शकता. बाजार वर-खाली होणारच, पण जे धीर धरतात ते नेहमीच जिंकतात!
अध्याय दोन : पीटर लिंचसारखे जिंकणारे स्टॉक कसे निवडायचे
मित्रांनो, पीटर लिंच म्हणतात की शेअर बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक असतात. पण जर तुम्हाला एक शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनायचं असेल, तर तुम्हाला कोणता स्टॉक कोणत्या गटात येतो हे समजून घ्यावं लागेल. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक स्टॉकच्या वाढण्याची क्षमता वेगळी असते. जर तुम्ही विचार न करता कुठल्याही स्टॉकमध्ये पैसे गुंतवले, तर तुम्ही खूप मोठी रिस्क घेत आहात.
काही स्टॉक हळू हळू वाढतात, जसं की कोल इंडिया किंवा ओएनजीसी. यांची वाढ मंद असते, पण ते चांगला लाभांश (डिव्हिडंड) देतात. हे स्टॉक त्यांच्यासाठी चांगले आहेत ज्यांना जास्त धोका घ्यायचा नाही आणि सुरक्षित परतावा हवा आहे.
मग आहेत स्थिर आणि विश्वासार्ह व्यवसाय चालवणारे स्टॉक, जसे की एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि टीसीएस. हे एका रात्रीत मल्टीबॅगर बनत नाहीत, पण दीर्घकाळात चांगली आणि सतत वाढ देतात आणि बाजारात मंदी आली तरी जास्त खाली येत नाहीत. काही स्टॉक जलद गतीने वाढणारे असतात, म्हणजे त्यांच्यात लवकर विस्तार होण्याची आणि जास्त नफा कमावण्याची क्षमता असते, जसे की डी-मार्ट आणि बजाज फायनान्स. डी-मार्टने भारतीय रिटेल बाजारात मोठी क्रांती घडवली आहे आणि बजाज फायनान्सने कर्ज बाजारात दबदबा निर्माण केला आहे. हे स्टॉक अशा गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहेत जे जास्त धोका घेऊ शकतात आणि मोठा परतावा मिळवू इच्छितात.
बाजारात काही चक्रीय स्टॉक (Cyclical Stocks) असतात, म्हणजे ते अर्थव्यवस्थेच्या चक्रानुसार वर-खाली होत राहतात. टाटा मोटर्स किंवा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) याची उदाहरणं आहेत. आर्थिक तेजीच्या काळात ते खूप वेगाने वाढतात, पण मंदी आल्यावर खाली येतात. गुंतवणूकदारांनी जेव्हा हे स्टॉक एकदम खालच्या पातळीवर असतात तेव्हा त्यात गुंतवणूक करावी, जेणेकरून अर्थव्यवस्था सुधारल्यावर त्यांच्या किमती वाढू शकतील.
आणखी एक श्रेणी आहे टर्नअराउंड स्टॉकची, म्हणजे ज्या कंपन्या एकेकाळी अडचणीत होत्या, पण नंतर पुन्हा वाढायला लागतात, जसं की सुझलॉन एनर्जी. ही कंपनी एकेकाळी मोठ्या तोट्यात होती, पण जेव्हा रिन्यूएबल एनर्जीचा ट्रेंड आला, तेव्हा गुंतवणूकदारांनी तिच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. असे स्टॉक जास्त धोकादायक असतात, पण योग्य वेळी गुंतवणूक केल्यास ते मल्टीबॅगर बनू शकतात.
आणि शेवटची श्रेणी म्हणजे अॅसेट प्ले स्टॉक (Asset Play Stocks). हे असे व्यवसाय असतात ज्यांच्याकडे काही लपलेल्या मालमत्ता (Hidden Assets) असतात, ज्या त्यांच्या शेअरच्या किमतीपेक्षा जास्त किमतीच्या असू शकतात. उदाहरणार्थ, काही रिअल इस्टेट कंपन्या ज्यांचं बाजारात कमी मूल्यांकन असतं, पण त्यांच्या मालकीच्या जमिनी किंवा प्रॉपर्टीची किंमत खूप जास्त असते. गुंतवणूकदारांना जेव्हा असं वाटतं की कंपनीची खरी मालमत्ता तिच्या स्टॉकच्या किमतीपेक्षा जास्त आहे आणि बाजाराला अजून हे मूल्य समजलेलं नाही, तेव्हा ते हे स्टॉक ओळखू शकतात.
पीटर लिंच म्हणतात की यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी, तुम्ही कोणत्या प्रकारच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत आहात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्टॉक वेगळ्या प्रकारे वागतो आणि जर तुम्ही या श्रेणी समजून गुंतवणूक केली, तर तुम्ही तुमचा धोका आणि संभाव्य फायदा चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकाल.
पीटर लिंचचा गुंतवणुकीबद्दलचा सगळ्यात मोठा मंत्र आहे – १० बॅगर्स (Ten Baggers) शोधणे. १० बॅगर्स म्हणजे असे स्टॉक, ज्यांच्यामध्ये तुमची गुंतवणूक १० पट किंवा त्याहून जास्त वाढवण्याची क्षमता असते. या अशा कंपन्या असतात, ज्या त्यांच्या उद्योगात काहीतरी नवीन करत असतात, नवीन उत्पादनं आणत असतात किंवा खूप वेगाने वाढत असतात.
सामान्य गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात मोठं आव्हान हे असतं की जेव्हा एखादा असा स्टॉक समोर येतो, तेव्हा त्याला ओळखायचं कसं? पीटर लिंच म्हणतात की जर तुमच्या आजूबाजूला एखादा नवीन व्यवसाय असेल, जो लोकांना खूप आवडत असेल, ज्याचे ग्राहक वाढत असतील आणि जो हळू हळू एक मोठा ब्रँड बनत असेल, तर तुम्ही त्यावर नक्कीच संशोधन करायला पाहिजे. वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे त्यांची विक्री आणि नफा सतत वाढत असतो आणि बाजारात त्यांची फारशी स्पर्धा नसते किंवा ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असतात.
आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे सुरुवातीला १० बॅगर स्टॉक्सकडे कुणी लक्ष देत नाही. जेव्हा रिलायन्स जिओ आलं, तेव्हा बऱ्याच लोकांना वाटलं की ही फक्त एक टेलिकॉम कंपनी आहे, जी स्वस्त डेटा देऊन लोकांना आकर्षित करत आहे. पण ज्यांना हे समजलं की जिओ फक्त एक टेलिकॉम कंपनी नाही, तर भारतातील डिजिटल क्रांती घडवणारा एक प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी योग्य वेळी गुंतवणूक करून खूप मोठा नफा कमावला.
लिंच म्हणतात की तुमच्या आजूबाजूला नेहमीच १० बॅगर्स असतात, तुम्हाला फक्त त्यांना कसं शोधायचं आणि समजून घ्यायचं हे माहित असायला हवं. ज्या कंपन्या नवीन उत्पादनं लाँच करत आहेत, नवीन ग्राहक जोडत आहेत आणि दरवर्षी त्यांचा नफा आणि बाजारातील हिस्सा वाढवत आहेत, तेच स्टॉक भविष्यात १० पट किंवा त्याहून जास्त वाढू शकतात.
बाजारात सगळ्यात जास्त परतावा अशा लोकांना मिळतो, ज्यांना नवीन ट्रेंड लवकर समजतात आणि जे धोका घेण्यास घाबरत नाहीत. पण फक्त शेअर बाजारात चांगला व्यवसाय शोधणं पुरेसं नाही, तर त्या व्यवसायात योग्य किमतीत गुंतवणूक करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा लोक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात, पण चुकीच्या किमतीला, ज्यामुळे त्यांना मिळणारा परतावा तेवढा चांगला नसतो.
म्हणूनच लिंच एक साधं Tool सांगतात, ते म्हणजे PE रेशो (Price to Earnings Ratio). PE रेशो हे एक साधं गणित आहे, जे सांगतं की कंपनीच्या शेअरची किंमत तिच्या कमाईच्या तुलनेत किती जास्त किंवा कमी आहे. जर एखाद्या शेअरचा PE खूप जास्त असेल, तर याचा अर्थ असा की स्टॉकची किंमत त्याच्या कमाईच्या तुलनेत खूप जास्त आहे. याचा अर्थ असा की लोक आधीच महागड्या किमतीत तो खरेदी करत आहेत आणि जर ती कंपनी लोकांच्या अपेक्षेइतकी वेगाने वाढत नसेल, तर त्याचा शेअर खाली येऊ शकतो.
दुसरीकडे, जर एखाद्या कंपनीचा PE कमी असेल, पण तिचा व्यवसाय मजबूत असेल आणि भविष्यात वाढणार असेल, तर ती एक चांगली गुंतवणुकीची संधी असू शकते. जर तुम्ही २००० च्या दशकात एचडीएफसी बँक किंवा इन्फोसिसचे शेअर्स खरेदी केले असते, जेव्हा त्यांचा PE रेशो वाजवी होता, तर आज तुमचे पैसे मल्टीबॅगर झाले असते. पण जर तुम्ही तेच शेअर्स जास्त किमतीत उशिरा खरेदी केले, तर तुमचा परतावा सुरुवातीच्या गुंतवणूकदारांइतका चांगला नसता.
तसंच, रिलायन्स जिओच्या आगमनानंतर, जेव्हा लोकांना वाटलं की ही कंपनी खूप वेगाने वाढेल, तेव्हा तिचा PE रेशो सुद्धा जास्त झाला होता. ज्या गुंतवणूकदारांनी आधी योग्य वेळी गुंतवणूक केली होती, त्यांना जास्त परतावा मिळाला.
लिंच म्हणतात की PE रेशो कधीही एकटा बघू नये. त्याची तुलना नेहमी कंपनीच्या कमाईच्या वाढीशी(profit growth)करा. जर एखादी कंपनी २५-३०% वेगाने वाढत असेल आणि तिचा PE २०-२५ असेल, तर ते वाजवी मूल्यांकन असू शकतं. पण जर एखादी कंपनी फक्त ५-१०% वेगाने वाढत असेल आणि तिचा PE ५०% असेल, तर तो स्टॉक जास्त मूल्यांकन केलेला असू शकतो.
बाजारातील गुंतवणूकदारांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे मूल्यांकन न बघता फक्त चांगल्या कंपनीवर लक्ष केंद्रित करणे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जर एखादी कंपनी चांगली असेल, तर ते कधीही तिचा शेअर खरेदी करू शकतात. पण सत्य हे आहे की जरी तुम्ही चांगल्या कंपनीत चुकीच्या किमतीत गुंतवणूक केली, तरी तुमचा परतावा कमी असू शकतो. म्हणूनच पीटर लिंच म्हणतात की योग्य व्यवसायासह, मूल्यांकन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बाजारात सातत्याने पैसे कमवणारे लोक तेच आहेत, ज्यांना कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलसोबत किंमत मूल्यांकन कसं समजून घ्यायचं हे माहित आहे.
अध्याय तीन : गुंतवणूकदारांना मारणारे गैरसमज आणि चुका
मित्रांनो, पीटर लिंच म्हणतात की शेअर बाजारातील सगळ्यात मोठा शत्रू स्वतः गुंतवणूकदार असतो. बाजारात पैसे गमावणं किंवा कमवणं हे फक्त स्टॉक निवडण्यावरच नाही, तर तुमच्या निर्णयांवर आणि तुमच्या मानसिकतेवर सुद्धा अवलंबून असतं. प्रत्येक नवीन गुंतवणूकदार काही सामान्य चुका करतो, ज्यामुळे त्याचा नफा कमी होऊ शकतो किंवा त्याचा पूर्ण पोर्टफोलिओ सुद्धा धोक्यात येऊ शकतो. जर तुम्ही या चुका टाळल्या, तर तुम्ही एक यशस्वी दीर्घकालीन गुंतवणूकदार बनू शकता.
सगळ्यात मोठी चूक म्हणजे बाजाराची वेळ(बाजाराला time करणे)ठरवण्याचा प्रयत्न करणे. बरेच लोक असं मानतात की ते बाजाराच्या एकदम खाली खरेदी करतील आणि एकदम वरच्या बाजूला विक्री करतील. पण खरं सांगायचं तर, कोविड-१९ च्या क्रॅशमध्ये सुद्धा कुणी बाजाराचा नेमका तळ किंवा टोक गाठू शकलं नाही. जेव्हा तो आला, तेव्हा सुद्धा कुणाला माहित नव्हतं की बाजार इथून आणखी खाली जाईल की लगेच वर येईल. जे लोक बाजार आणखी खाली येण्याची वाट बघत होते, त्यांनी पॅनिक सेलिंग केलं आणि जे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करत होते, त्यांनी मल्टीबॅगर परतावा मिळवला.
दुसरी मोठी चूक म्हणजे संशोधन न करता दुसऱ्याच्या सल्ल्यावर शेअर्स खरेदी करणे. बऱ्याचदा लोक न्यूज चॅनेल किंवा व्हॉट्सअॅपच्या टिप्स बघून शेअर्स खरेदी करतात, कंपनीमध्ये खरंच वाढ होण्याची क्षमता आहे की नाही हे न बघता. जर कुणी फक्त सांगितलं म्हणून येस बँक किंवा व्होडाफोन आयडियासारखे शेअर्स त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत आहे हे न पाहता खरेदी केले,  तर त्यांनी आपले पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवले आहेत. गुंतवणुकीचा सोनेरी नियम हा आहे की कधीही फक्त देखावा किंवा अफवांवर विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका.
गुंतवणूकदार अनेकदा आणखी एक चूक करतात, ती म्हणजे लवकर नफा बुक करणे आणि तोटा करणारे शेअर्स ठेवून देणे. विचार करा, जर कुणी एचडीएफसी बँक किंवा इन्फोसिसचे शेअर्स फक्त २०-३०% नफ्यावर विकले असते, तर त्यांनी दीर्घकाळात मिळणारा मोठा परतावा गमावला असता. पण जे लोक तोट्यात जाणारे शेअर्स या आशेने ठेवून देतात की ते कधीतरी परत येतील, त्यांना आणखी मोठं नुकसान सहन करावं लागतं. बाजारात ज्या शेअर्समध्ये काही दम नाही, त्यांना धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. जर एखादी कंपनी मूळतःकमजोर होत असेल, तर लवकर बाहेर पडणेच चांगले. लिंच म्हणतात की शेअर बाजार भावनांवर आधारित निर्णय घेण्याची जागा नाही. भीती किंवा लोभाच्या आधारावर कधीही गुंतवणूक करू नका, त्याऐवजी संशोधन आणि संयमाने गुंतवणूक करा. जो गुंतवणूकदार आपल्या रणनीतीवर टिकून राहतो, पॅनिक सेलिंग टाळतो आणि दीर्घकालीन विचार करतो, तोच बाजारात जास्त पैसे कमवतो.
मित्रांनो, शेअर बाजाराबद्दल बरेच चुकीचे विचार आहेत, जे नवीन गुंतवणूकदारांचे निर्णय बिघडवू शकतात. पीटर लिंच म्हणतात की जे लोक या गैरसमजांमध्ये अडकतात, ते बाजारात कधीही सातत्याने पैसे कमवू शकत नाहीत. जर तुम्हाला एक स्मार्ट गुंतवणूकदार बनायचे असेल, तर तुम्हाला हे मिथक मोडून खरे गुंतवणूक तत्त्वे समजून घ्यावी लागतील.
सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे घसरलेला स्टॉक परत वाढेल. अनेकांना असं वाटतं की जर एखादा शेअर ५०० रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत घसरला, तर तो नक्कीच ५०० रुपयांवर परत येईल. पण बाजारात असा कोणताही नियम नाही. जर कंपनीची आर्थिक स्थिती बिघडत असेल, तर तिचा शेअर आणखी खाली जाऊ शकतो किंवा कधीही सावरणार नाही. बरेच लोक येस बँक आणि रिलायन्स कम्युनिकेशनसारख्या शेअर्समध्ये अडकले, कारण त्यांना वाटलं की ते त्यांच्या उच्चांकावर परत येतील, पण असं कधीच झालं नाही.
आणखी एक मोठा गैरसमज असा आहे की जर एखादा शेअर खूप वाढला असेल, तर त्यात गुंतवणूक करू नये. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की ज्या शेअर्समध्ये आधीच २ पट, ५ पट किंवा १० पट वाढ झाली आहे, त्यात पैसे गुंतवणं आता निरुपयोगी आहे. पण सत्य हे आहे की जर एखादी कंपनी सातत्याने वाढत असेल आणि तिचा व्यवसाय मजबूत असेल, तर तिच्यामध्ये अजूनही वाढ होण्याची क्षमता असते. जर कुणी असा विचार केला असता, तर त्याने कधीही एचडीएफसी बँक, टायटन किंवा बजाज फायनान्ससारख्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली नसती, कारण या कंपन्या सुरुवातीपासूनच वाढत आहेत आणि दीर्घकाळात त्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
आणखी एक सामान्य गैरसमज असा आहे की शेअर बाजार फक्त तज्ञांसाठी आहे. अनेकांना असं वाटतं की जर तुम्हाला फायनान्स किंवा इकोनॉमिक्सचं सखोल ज्ञान नसेल, तर तुम्ही गुंतवणूक करू शकत नाही. पीटर लिंच म्हणतात की एक सामान्य माणूस सुद्धा, जर तो त्याच्या निरीक्षण शक्तीचा आणि कॉमन सेन्सचा योग्य वापर करत असेल, तर शेअर बाजारात खूप चांगलं उत्पन्न मिळवू शकतो. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूचे लोक कोणत्या कंपन्यांची उत्पादनं वापरत आहेत, कोणत्या सेवा लोकप्रिय होत आहेत आणि कोणता व्यवसाय सातत्याने वाढत आहे हे पाहिलं, तर तुम्हाला तज्ञांपेक्षाही चांगले स्टॉक सापडतील. लिंच म्हणतात की गुंतवणूक हा कॉमन सेन्सचा खेळ आहे, पण लोक त्याला अनावश्यकपणे गुंतागुंतीचा बनवतात. जर तुम्ही या गैरसमजांना दूर करून व्यावहारिक गुंतवणूक केली, तर तुम्ही बाजारातील कोणत्याही तज्ञापेक्षा चांगली कामगिरी करू शकता.
चौथा अध्याय: यशस्वी पोर्टफोलिओ कसा तयार करायचा
मित्रांनो, पीटर लिंच म्हणतात की योग्य स्टॉक निवडणे हे एक मजबूत पोर्टफोलिओ धोरण बनवण्याइतकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा लोक फक्त एक किंवा दोनच स्टॉकमध्ये पैसे गुंतवतात किंवा इतके स्टॉक खरेदी करतात की त्यांना त्यांचा मागोवा ठेवणं सुद्धा कठीण होतं. एका यशस्वी गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीत विविधता कशी आणायची आणि त्याच्या जोखीम सहनशीलतेनुसार संतुलित पोर्टफोलिओ कसा तयार करायचा हे समजून घेतलं पाहिजे.
जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्टॉक असले पाहिजेत. जर तुम्ही फक्त जास्त वाढीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली, तर धोका सुद्धा जास्त असतो, कारण हे स्टॉक जास्त अस्थिर असतात. म्हणून एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टीसीएससारख्या विश्वासार्ह कंपन्या सुद्धा पोर्टफोलिओमध्ये असाव्यात, ज्यामुळे स्थिरता येऊ शकते. लिंच म्हणतात की पोर्टफोलिओमध्ये विविधता असावी, पण इतकी जास्त नसावी की तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा मागोवा घेऊ शकत नाही. जर तुमच्याकडे १० ते १५ काळजीपूर्वक निवडलेले स्टॉक असतील, जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असतील, तर तुम्ही बाजारातील चढ-उतार चांगल्या प्रकारे हाताळू शकता आणि सातत्यपूर्ण परतावा मिळवू शकता. एका हुशार गुंतवणूकदाराचं ध्येय नेहमीच धोका आणि संभाव्य फायदा यांचा योग्य समन्वय साधणे असतं.
पीटर लिंच म्हणतात की शेअर बाजारात सगळ्यात मोठा नफा फक्त अशा लोकांना मिळतो, जे संयम बाळगतात आणि त्यांची गुंतवणूक दीर्घकाळासाठी धरून ठेवतात. बरेच नवीन गुंतवणूकदार थोडा नफा मिळताच आपले स्टॉक विकण्याची चूक करतात, पण जे गुंतवणूकदार त्यांना जे मोठे स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक वाटतात ते धरून ठेवतात, तेच जास्त पैसे कमवतात. जर कुणी टायटन, एशियन पेंट्स किंवा बजाज फायनान्ससारखे शेअर्स फक्त एका वर्षासाठी अल्पकालीन परताव्यासाठी खरेदी केले असते, तर कदाचित त्याला २०-३०% नफा मिळाला असता, पण ज्या गुंतवणूकदारांनी हे शेअर्स १०-१५ वर्षे ठेवले, त्यांचे पैसे ५० पटीने वाढलेले दिसतात. यामागचं कारण सोपं आहे की चांगल्या कंपन्या काळानुसार मोठ्या होतात आणि त्यांच्या शेअर्सची किंमतही त्यांच्या कमाईसोबत वाढते.
कधीकधी बाजारात मंदी येते, कधीतरी तात्पुरते चढ-उतार होतात, कधी आर्थिक संकट येतं, कधी जागतिक संकट येतं, कधी बाजार कोसळतो, पण जो गुंतवणूकदार आपले शेअर्स लगेच विकतो, तो या तात्पुरत्या हालचाली पाहून त्याचे मोठे परतावे गमावतो. २००८ मध्ये आर्थिक संकट आलं, तेव्हाही बाजार कोसळला होता, पण ज्यांनी धीर धरला, त्यांची गुंतवणूक २०१० ते २०२० दरम्यान मल्टीबॅगर बनली. लिंच म्हणतात की सर्वोत्तम गुंतवणूक ती आहे जी कालांतराने संपत्ती निर्माण करते आणि तुम्हाला समृद्ध करते. म्हणून, जर तुम्ही चांगल्या कंपनीत गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही तिच्या किमतीच्या लहान-मोठ्या हालचालींना घाबरू नये. गुंतवणूक ही एक मॅरेथॉन आहे, छोटी धाव नाही. जो दीर्घकाळ टिकतो तोच शेअर बाजारात जिंकतो.
फक्त शेअर बाजारात स्टॉक शोधणे आणि गुंतवणूक करणे पुरेसे नाही, तर कधी ठेवायचे आणि कधी विकायचे हे समजून घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पीटर लिंच असं म्हणतात की गुंतवणूकदार अनेकदा चुकीचे शेअर्स धरून ठेवतात आणि चांगले शेअर्स लवकर विकून टाकतात. ही सगळ्यात मोठी चूक आहे जी दीर्घकालीन परतावा नष्ट करू शकते. बरेच लोक घाबरून चांगले शेअर्स विकतात, कारण त्यांची किंमत तात्पुरती खाली आली आहे, पण त्यांना हे समजत नाही की जर कंपनीचा व्यवसाय मजबूत असेल, तर किंमत शेवटी परत वर जाईल. २०२० मध्ये जेव्हा एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि टायटनसारखे शेअर्स पडले, तेव्हा बरेच लोक घाबरून ते विकत होते, पण ज्यांनी धीर धरला आणि आपले शेअर्स धरून ठेवले, त्यांची गुंतवणूक फक्त एक-दोन वर्षात दुप्पट झाली.
दुसरीकडे, गुंतवणूकदार आणखी एक चूक करतात की ते निरुपयोगी आणि संघर्ष करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स फक्त यासाठी धरून ठेवतात की त्यांना वाटतं की ते कधीतरी सावरतील. जर एखाद्या कंपनीला आर्थिक अडचणी येत असतील, तिचा बाजारातील हिस्सा कमी होत असेल आणि तिची वाढ मंदावत असेल, तर तो शेअर विकायला पाहिजे. त्याला धरून ठेवण्यात काही फायदा नाही. लिंच म्हणतात की एका हुशार गुंतवणूकदाराने हे समजून घेतलं पाहिजे की होल्ड करण्याचा निर्णय कंपनीच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित असावा, भावनांवर नाही. जर एखादी कंपनी वाढत असेल, नवीन बाजारपेठा काबीज करत असेल आणि तिची आर्थिक स्थिती मजबूत असेल, तर तो शेअर दीर्घकाळासाठी धरून ठेवावा. पण जर एखादी कंपनी तिच्या उद्योगात कमजोर होत असेल, स्पर्धेत मागे पडत असेल आणि तिचे व्यवस्थापन चांगले निर्णय घेत नसेल, तर त्यातून लवकर बाहेर पडा. सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे चांगल्या कंपन्या संयमाने धरून ठेवा आणि कमजोर व्यवसायांमधून लवकर बाहेर पडा. ज्यांना हा नियम समजतो, तेच शेअर बाजारात सातत्याने पैसे कमवू शकतात.
पाचवा अध्याय: कधी करावी गुंतवणूक?
मित्रांनो, जर तुम्हाला शेअर बाजारात कधी प्रवेश करायचा असा प्रश्न पडला असेल, तर पीटर लिंचचं उत्तर एकदम सोपं आहे. सध्या! गुंतवणुकीचं सगळ्यात मोठं रहस्य हेच आहे की तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल, तितके जास्त पैसे कमवाल आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकाल. बरेच लोक बाजारात प्रवेश करण्यापूर्वी योग्य वेळेची वाट पाहतात, पण सत्य हे आहे की बाजाराचं वेळेचं नियोजन करणं जवळजवळ अशक्य आहे. बाजार नेहमीच वर-खाली होत राहतो, पण जर तुम्ही योग्य संशोधन करून चांगल्या कंपनीत गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला दीर्घकालीन फायदे नक्की मिळतील. शेअर बाजारात फक्त तेच लोक पैसे मिळवतात जे विचारपूर्वक गुंतवणूक करतात आणि संयम बाळगतात.
पीटर लिंच म्हणतात की तुम्हाला तज्ञ असण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचं निरीक्षण कौशल्य वाढवू शकता आणि बाजारात संधी शोधू शकता. तुम्ही बघा की लोक कोणती उत्पादनं वापरत आहेत, कोणत्या सेवा वेगाने वाढत आहेत आणि कोणत्या कंपन्या त्यांचा बाजार वाढवत आहेत. मग त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल समजून घ्या. तिची आर्थिक स्थिती पाहा आणि जर सगळं काही मजबूत वाटत असेल, तर दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करा. एका गुंतवणूकदाराने समजून घेतलेला सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे शेअर बाजारात यश हे फक्त आकडेवारीचा खेळ नाही, तर मानसिकतेचा खेळ आहे. जे लोक धीर धरतात, बाजारातील तात्पुरत्या चढ-उतारांना घाबरत नाहीत आणि चांगल्या कंपन्या टिकवून ठेवण्याचा आत्मविश्वास बाळगतात, तेच खरे विजेते ठरतात.
आज तुमच्या आर्थिक भविष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस असू शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करणं हे काही धोका नाही, तर एक संधी आहे, जी तुमच्या संपत्ती निर्माण करण्याच्या प्रवासाला गती देऊ शकते. पीटर लिंचचं हे तत्त्वज्ञान स्वीकारा, तुमचं संशोधन करा, गोष्टी समजून घ्या आणि तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासाला सुरुवात करा. जितक्या लवकर तुम्ही कृती कराल, तितक्या लवकर तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करायला लागतील.
तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल, तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, धन्यवाद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा