शैक्षणिक बातम्या

परिसीमन आयोग

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम 82 अन्वये केंद्र सरकार द्वारा परिसीमन आयोग गठित केला जातो.
जम्मू काश्मीर लडाख या केंद्रशासित प्रदेशासह ईशान्येकडील चार राज्य मनिपुर, आसाम, अरुणाचल प्रदेश व नागालँड या प्रदेशांसाठी मतदार संघाची पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोग सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गठित केला आहे.
परिसीमनचा मुख्य उद्देश देशातील सर्व नागरिकांना समान प्रतिनिधित्वाचा हक्क प्रदान करणे होय.

एक छान अनुभव

एक छान अनुभव जो मी स्वत: आजही घेत आहे,  तुमच्यासाठी पाठवत आहे. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. नुकसान अजिबात नाही. 😊  रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत....  याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काहीच नाही' असं म्हटलं की तो, 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायचा.  मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. तोपण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायचा.  काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला , अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्याच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायoचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.  तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जातानाही 'आत देव आहे' या विश्वासाने नाही का नमस्कार करतो......... तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा.  अट फक्त एकच, की तुम्ही  'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तरं दिलेच पाहिजे....

चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजेत.



मनोहर पर्रिकर देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या गावच्या कलिंगडांची सांगितलेली गोष्ट भरपूर काही शिकवणारी आहे. कलिंगडातून समजावला आयुष्याचा अर्थ मी गोव्यातील पारा गावचा. त्यामुळे आम्हाला सगळे पर्रिकर बोलतात. माझ गाव कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होते. मी लहान असताना आमच्या गावातील शेतकरी मे महिन्यात कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचे. जास्तीत जास्त मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बोलावले जायचे. काही वर्षांनी मी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आयआयटी मुंबईला गेलो. साडेसहा वर्षांनी जेव्हा मी पुन्हा गावी गेलो. त्यावेळी मी कलिंगड घेण्यासाठी बाजारात गेलो. त्यावेळी तिथे छोटया आकाराची कलिंगड मला दिसले. जो शेतकरी कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा त्याला भेटण्यासाठी मी गेलो. त्यावेळी सूत्र त्याच्या मुलाच्या हाती होती. त्याचा मुलगा कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा पण त्यात फरक पडला होता. ज्यावेळी त्या मुलाचे वडिल आम्हाला कलिंगड खायला द्यायचे त्यावेळी कलिंगडाच्या बिया एका भांडयात जमा करायला ते आम्हाला सांगायचे. पुढच्या हंगामासाठी ते या बिया गोळा करायचे. आम्ही त्यांच्यासाठी बिनपगारी बालमजूर होतो. ते स्पर्धेसाठी सर्वोत्तम कलिंगड ठेवायचे त्यामुळे पुढच्या हंगामात अधिक मोठया आकाराचे चांगले कलिंगड मिळायचे. पण त्यांच्या मुलाने जेव्हा व्यवसाय संभाळला तेव्हा मोठया आकाराच्या कलिंगड विक्रीतून जास्त पैसा मिळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे मोठी कलिंगडे तो बाजारात विकायचा आणि छोटी कलिंगडे स्पर्धेसाठी ठेवायचा. त्यामुळे त्या बियांमधून तयार होणा-या कलिंगडचा आकार छोटा असायचा. जशी वर्ष पुढे सरकत गेली तसा कलिंगडाचा आकार छोटा होत गेला. कलिंगडामध्ये एका पिढीमध्ये एका वर्षाचे अंतर असते. सातवर्षात परामधील सर्वोत्तम कलिंगड संपलेले होते. माणसांमध्ये २५ वर्षानंतर एक पिढी बदलते. त्यामुळे आपल्याला पुढच्या २०० वर्षांनी आपण मुलांना शिकवताना काय चूक केली ते शोधावे लागेल. आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगली शिकवण दिली नाही तर, कलिंगडासारखेच आपल्या बाबतीत घडू शकते.